Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या अपघाताने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. अत्यंत ज्वलनशील प्रोपलीन गॅस वाहून नेणारा टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी उलटल्याने मोठ्या स्फोटाचा धोका निर्माण झाला आणि महामार्गावरील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारा हा टँकर आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाला. अपघातानंतर काही वेळातच टँकरमधून प्रोपलीन गॅसची गळती सुरू झाली. हा गॅस हवेत मिसळताच अत्यंत वेगाने पेट घेऊ शकतो. बोगद्याजवळील बंदिस्त परिसर, वाहनांची गर्दी आणि संध्याकाळची वेळ लक्षात घेता, अगदी लहान ठिणगीही भीषण स्फोटाला कारणीभूत ठरू शकली असती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली. (Mumbai Pune Expressway)
या निर्णयामुळे सुरक्षितता राखली गेली, पण त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसला. तब्बल 15 तासांहून अधिक काळ एक्सप्रेसवे ठप्प राहिला. काही वाहनचालक रात्रीभर रस्त्यावरच अडकून पडले. पुण्याच्या दिशेने एकाच लेनवरून मर्यादित वाहतूक सुरू करण्यात आली, मात्र बोरघाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
गळती अजूनही पूर्णपणे थांबलेली नसल्याने टँकर हटवणं धोकादायक ठरत आहे. तज्ज्ञ पथक गॅस नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत असून परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत आडोशी बोगद्याकडील मुंबई मार्गिका बंदच राहणार आहे.
या घटनेमुळे धोकादायक रसायनांची वाहतूक, घाटातील तीव्र वळणं आणि आपत्कालीन व्यवस्थापन याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रवाशांनी सध्या लोणावळा–खंडाळा मार्ग टाळावा. दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्यांनी ताम्हिणी घाट, तर ठाणे–कल्याणकडे जाणाऱ्यांनी माळशेज घाट मार्गाचा वापर करावा. प्रवासाचा वेळ वाढू शकतो, त्यामुळे इंधन, पाणी आणि आवश्यक तयारी करूनच निघणं अत्यंत गरजेचं आहे.







