पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या आर्थिक सहाय्य योजनांसाठी एकूण ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या योजनांचा उद्देश पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. या योजना पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही खुल्या आहेत. दरम्यान, कोणत्या शाखेतील किती विद्यार्थ्यांना किती रक्कम मिळाली त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

– छत्रपती शिवाजी महाराज आर्थिक सहाय्य योजना: पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील एकूण ३६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये मिळतील.
– क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आर्थिक सहाय्य योजना: ७८३ पदवीपूर्व आणि २४४ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये मिळतील.
– लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक सहाय्य योजना: २९२ पदवीपूर्व आणि २२५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये मिळतील.
– राजर्षी शाहू महाराज आर्थिक सहाय्य योजना: ९२ कला, २०७ वाणिज्य आणि २४९ विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व स्तरावर प्रत्येकी ६,००० रुपये मिळतील, तर ९१ कला, ४० वाणिज्य आणि १४४ विज्ञान विद्यार्थ्यांना पदव्युत्तर स्तरावर समान रक्कम मिळणार आहे.
– महात्मा ज्योतिराव फुले आर्थिक सहाय्य योजना: कला शाखेच्या ४०, वाणिज्य शाखेच्या १९३ आणि विज्ञान शाखेच्या २१६ विद्यार्थ्यांना पदवीपूर्व स्तरावर प्रत्येकी ६,००० रुपये, तर कला शाखेच्या ५०, वाणिज्य शाखेच्या ५१ आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर स्तरावर प्रत्येकी ८,००० रुपये मिळणार तर विज्ञान शाखेच्या १८७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १६,००० मिळणार आहे .
– स्वामी विवेकानंद आर्थिक सहाय्य योजना: पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील ९३ पदवीपूर्व आणि १८ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रत्येकी २००० रुपये मिळतील.
विद्यापीठाचे उद्दिष्ट
विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि त्यांच्या योजना अधिक समावेशक बनवणे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले, “शासकीय योजनांचा लाभ घेणारे विद्यार्थी विद्यापीठ शिष्यवृत्तीसाठी पात्र नव्हते. त्यामुळे शिष्यवृत्ती निधीचा कमी वापर होत होता. आता शिष्यवृत्ती योजनांचे नाव “आर्थिक सहाय्य योजना” असे ठेवले आहे. या बदलामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभांसाठी पात्र होता येते. विद्यापीठाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील अधिक महाविद्यालयांना समाविष्ट करण्यासाठी योजनांची व्याप्ती देखील वाढवली आहे. नवीन नियमांमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. विद्यापीठाने योजनांसाठी निधी वाटप केला आहे आणि पात्र विद्यार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचतील याची खात्री करण्यासाठी काम करत आहे.







