पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या रवींद्र धंगेकरांचा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी पराभव केला. त्यानंतर विधानसभेला हेमंत रासने यांनी धंगेकरांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीचं तिकीट काँग्रेसने धंगेकरांना दिल्यामुळे पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद समोर आला होता. अनेकांकडून विधानसभेच्या तिकीटाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यातील काँग्रेस नेत्यांना धंगेकर नकोत याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे कसब्यातील पराभवानंतर आता रवींद्र धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे तर्क वितर्क लावले जात होते. मात्र ह्या बाबी खुद्द रवींद्र धंगेकरांनी फेटाळून लावल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच त्यांनी गुरूवारी (ता.30) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदें यांना भेटल्यामुळे धंगेकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगू लागल्या होत्या.
मात्र, आता खुद्द धंगेकरांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी आपण एकनाथ शिंदेंना का भेटलो याबाबतची माहिती सांगितली. ते म्हणाले, मी काल माझ्या कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो. माझ्या वैयक्तिक कामानिमित्त मी त्यांना भेटलो. यावेळी त्यांच्या पक्षात जाण्याबाबतची काहीही चर्चा नाही झाली.’
तुम्ही शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची चर्चा सुरू असल्याचं विचारताच धंगेकर म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माझा थोडा प्रॉब्लेम होता, त्यानिमित्त मी त्यांना भेटलो. मला वाटलं तर मी अजितदादांना देखील भेटू शकतो. माझे त्यांच्याशी पूर्वीचे संबंध आहेत. मात्र, मी काँग्रेसमध्येच राहणार आहे शिवसेनेत प्रवेश करणार नाही, असं रवींद्र धंगेकरांनी स्पष्ट केलं आहे.







