प्रतिनिधी – गोरख जाधव

Dorlewadi : केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत डोर्लेवाडी येथे राबविण्यात आलेली नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर तिचे जल अर्पण करून ग्रामपंचायतीकडे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले. जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती बारामतीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामपातळीवर राबविण्यात आलेल्या या योजनेमुळे गावातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या वतीने जलपूजन करून योजनेचे हस्तांतरण करण्यात आले.
कार्यक्रमास पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे, पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता अश्विनी मेश्राम, माजी सभापती अशोक नवले, माजी सभापती डॉ. प्रतिभा नेवसे, खरेदी-विक्री संघाचे संचालक ज्ञानदेव नाळे, माजी संचालक भगवान क्षीरसागर, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त डॉ. मोहन नेवसे, छत्रपती कारखान्याचे संचालक नितीन मासाळ, माजी संचालक रमेश मोरे, सरपंच सुप्रिया नाळे, उपसरपंच सुनील म्हेत्रे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविकात सोमनाथ भिले यांनी योजनेची संपूर्ण माहिती दिली. गावातील घरांना देण्यात आलेली नळ जोडणी, पाण्याच्या स्रोताची उपलब्धता, जलसाठा व्यवस्थापन तसेच भविष्यातील देखभाल याबाबत त्यांनी सविस्तर माहिती मांडली. या योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची रोजची पायपीट थांबणार असून आरोग्यदृष्ट्या गावाला मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाबाबत घोषणा देत प्रभात फेरी काढून जनजागृती केली. ज्या ठिकाणी नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन मान्यवरांनी जलपूजन केले. आरोग्य सेवकांनी पाण्याची गुणवत्ता तपासणी केली. मंदिर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
शेवटी जल अर्पण करून योजनेचे हस्तांतरण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पाणी बचतीची शपथ घेतली. सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे, निवृत्ती नेवसे व मनोज नाळे यांनी मनोगत व्यक्त करत योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. गावाच्या विकासात पाणीपुरवठा ही मूलभूत गरज पूर्ण करणारी ही योजना ठरणार असून तिच्या योग्य देखभालीद्वारे दीर्घकाळ लाभ मिळविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.







