अहिल्यानगर: अहिल्यानगरातील (Ahilyanagar Crime) भिस्तबाग महाल परिसरात घडलेली ही घटना अत्यंत (Pune News) धक्कादायक आणि समाज हादरवणारी आहे. केवळ 16 वर्षीय मुलीवर एका प्रौढ आरोपीने चाकूने वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे, हे केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचेच नव्हे, तर कायद्याच्या सैलपणाचेही उदाहरण मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सचिन लक्ष्मण पोटे यांना त्यांच्या घरामागील खोलीतून आरडाओरड ऐकू आली. त्यांनी पाहिले असता महेश माणिक भेटे हा मुलीच्या अंगावर बसून तिच्या गळ्यावर चाकूने वार करत होता. दरवाजा लाथ मारून उघडण्यात आल्याने आणि नागरिकांनी तत्परतेने हस्तक्षेप केल्याने मुलगी थोडक्यात बचावली. ती रक्ताच्या थारोळ्यातून धावत बाहेर आली, तर आरोपी तिच्या मागे चाकू घेऊन धावत होता. या भयावह प्रसंगाने परिसरातील नागरिकही थरारले.

मुलगी अकरावीची विद्यार्थिनी असून, घटनेपूर्वी ती आरोपीसोबत दुचाकीवरून त्या खोलीत गेली होती. खोलीत नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र काही क्षणांतच आरोपीने तिच्या गळ्यावर सपासप वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात सर्वात चिंतेची बाब म्हणजे आरोपी महेश भेटे याचा गुन्हेगारी इतिहास. तो यापूर्वीच खुनाच्या गुन्ह्यात अटकेत होता आणि सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे. जामिनावर असतानाच त्याने पुन्हा अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे. अशा धोकादायक प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना जामिनावर मोकळे सोडले जाते, हीच कायदा आणि न्यायव्यवस्थेतील मोठी त्रुटी असल्याची चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप कळलेले नाही, परंतु मुलगी शुद्धीवर आल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा “जामिनावर सुटलेले आरोपी पुन्हा गुन्हे करत आहेत” हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी तुरुंगवासाची शिक्षा दिली नाही, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो.







