Manikrao Kokate : पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारासंबंधी झालेल्या आरोपांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.पार्थ पवार यांच्यावरील आरोपांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही राजकीय दबावाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी आरोप सिद्ध झाल्यास अजित पवार राजीनामा देतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. अजित पवार कधीही चुकीची कृती करणार नाहीत, असा संपूर्ण पक्षाला विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
अजित पवार यांना जाणूनबुजून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांच्या दबावामुळे आणि माध्यमांतील चर्चेमुळे हे प्रकरण अधिक फुगवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील जनता अजित पवार यांचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत जाणते, त्यामुळे त्यांच्यावर होणारे आरोप आधारहीन असल्याचे ते म्हणाले. अशा गैरव्यवहारात अजित पवार सहभागी असतील, ही कल्पनाही चुकीची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्यावरही कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली. खडसे यांनी आरोपांच्या वेळी राजीनामा दिल्याचे सांगत अजित पवारांनीही तसे करावे, असा सवाल उपस्थित केला होता. यावर कोकाटे म्हणाले की केवळ आरोपांवरून कोणालाही दोषी ठरवणे योग्य नाही. चौकशी होणे आवश्यक आहे आणि त्या चौकशीचा निकाल येईपर्यंत कोणताही निर्णय घेता येत नाही. दोष सिद्ध झाल्यास अजित पवार राजीनामा देतील, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
युतीच्या चर्चेबाबत बोलताना कोकाटे म्हणाले की महायुतीमध्ये अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. स्थानिक परिस्थिती, स्थानिक नेते आणि आमदार यांच्या चर्चेनुसार युतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. काही ठिकाणी युतीची शक्यता आहे, तर काही ठिकाणी नाही. सध्या आढावा सुरू असून परिस्थितीनुसार निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या सर्व घडामोडींमुळे पार्थ आणि अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चांना वेग आला असून आगामी घडामोडींवर राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.







