बेळगाव: मुख्याध्यापकाची बदली व्हावी या एका विकृत विचारातून शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळल्याची धक्कादायक घटना बेळगावातील सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शाळेतील 11 मुलांना विषबाधा झाली होती, मात्र सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने सर्व मुले सुरक्षित आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कटात सागर सक्रेप्पा पाटील (29), नागनगौडा बसप्पा पाटील (25) आणि कृष्णा यमनप्पा मादर (26) या तिघांचा सहभाग आहे.
नेमकं काय घडलं?
हुलीकट्टी येथील जनता सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील 11 विद्यार्थ्यांना साधारण पंधरा दिवसांपूर्वी अचानक पोटात दुखणे, उलट्या होणे आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. एकूण 41 विद्यार्थी असलेल्या या शाळेतील मुलांची अवस्था पाहून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि एक धक्कादायक सत्य समोर आले.
शाळेतील मुख्याध्यापक सुलेमान घोरी नायक यांची बदली व्हावी म्हणून सागर पाटील नावाच्या व्यक्तीने हा भयानक कट रचला. गेल्या 14 वर्षांपासून शाळेत कार्यरत असलेल्या या मुख्याध्यापकांना हटवण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याचा विकृत विचार त्याने केला. जर विद्यार्थी विषबाधेमुळे मृत झाले तर त्याचा ठपका मुख्याध्यापकांवर येईल आणि त्यांची बदली करणे सोपे होईल, यामुळे आरोपीने अनेक निष्पाप बालकांचा जीव धोक्यात घातला आहे.
असा रचला कट
या कटात आरोपी सागर पाटीलने नागनगौडा आणि कृष्णाला सामील केले. या दोघांनी कीटकनाशक आणले. त्यानंतर, शाळेतीलच एका मुलाला चॉकलेट आणि 500 रुपयांचे आमिष दाखवून त्याला ते कीटकनाशक शाळेच्या पाण्याच्या टाकीत ओतण्यास सांगितले. त्या मुलानेही त्यांच्या सांगण्यानुसार विष पाण्याच्या टाकीत टाकले. या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.







