मध्य प्रदेश: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान (Madhya Pradesh News) अपघातानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असतानाच आता मध्य प्रदेशात घडलेल्या हेलिकॉप्टर घटनेने सुरक्षिततेच्या प्रश्नांवर नव्याने चर्चा सुरू केली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूबाबत आमदार रोहित पवार यांनी अपघात (Mohan Yadav) नसून घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केल्यानंतर विमान कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर आणि उड्डाण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील ताज्या घटनेने या चर्चेला अधिक धार दिली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे हेलिकॉप्टर खंडवा जिल्ह्यात उड्डाण घेताच काही क्षण नियंत्रणाबाहेर गेल्याची घटना समोर आली. पंधना येथे ‘लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टरने हवेत झेप घेतल्यानंतर पुढे सरकण्याऐवजी ते मागे झुकू लागले आणि काही क्षण हवेत अस्थिर झाले. उपस्थित नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सुदैवाने वैमानिकाने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर स्थिर केले आणि काही वेळातच ते सुरक्षितपणे मार्गस्थ झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुख्यमंत्री सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
राज्यातील राजकीय नेत्यांच्या हवाई प्रवासाबाबत आधीच संशयाची छाया असताना अशा घटना अधिकच चिंताजनक ठरत आहेत. उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणी, हवामानाचा अचूक अंदाज आणि वैमानिकांचे प्रशिक्षण या सर्व बाबी काटेकोरपणे पाळल्या जात आहेत का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, व्हीआयपी उड्डाणांसाठी स्वतंत्र सुरक्षा प्रोटोकॉल असला तरी त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हवाई सुरक्षेबाबत पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.







