मुंबई: ठाकरे गटाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या ६ बंडखोर खासदारांनी काल (22 जून) अधिकृतपणे प्रवेश केला. या घडामोडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले असून, हे सर्व खासदार आगामी निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर नक्कीच निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या मतदारसंघातील कामे रखडली असून विकास निधी मिळत नाही, असे कारण देत या खासदारांनी ठाकरे गटावर आरोप केले होते. मात्र, त्यांची ही तक्रार आता खोटी ठरत असल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेंतर्गत (MPLADS) रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक कामांसाठी मोठा निधी उपलब्ध असतो. पण, प्रत्यक्षात या खासदारांनी मंजूर झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चच केलेला नाही.

या खासदारांच्या निधीच्या खर्चाचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे (सर्व आकडे कोटीमध्ये):
-
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी): 14.70 कोटी मंजूर होते, मात्र खर्च केवळ 0.71 कोटी झाला आहे.
-
संजय जाधव (परभणी): 14.70 कोटींपैकी केवळ 3.78 कोटी खर्च झाले आहेत.
-
नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली): 19.02 कोटी मंजूर असून केवळ 5.02 कोटींचा वापर झाला आहे.
-
संजय देशमुख (वाशिम): 18.60 कोटींपैकी फक्त 1.41 कोटी खर्च करण्यात आले आहेत.
-
ओमराजे निंबाळकर (धाराशिव): 18.47 कोटी मंजूर असताना केवळ 1.97 कोटी खर्च झाले आहेत.
-
संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई): 14.70 कोटी मंजूर असून केवळ 0.15 कोटी खर्च झाले आहेत.
या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, या खासदारांकडे विकास कामांसाठी मोठा निधी शिल्लक असूनही तो खर्च झाला नाही. त्यामुळे, केवळ विकास निधी मिळत नसल्याचे कारण देऊन केलेले बंडाचे समर्थन आता राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि टीकेचा विषय बनले आहे.







