नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयाविरोधात आता टॅक्सी आणि वाहनचालकांनी आवाज उठवला आहे. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने 4 ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे.

यापूर्वी जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर आता वाहनचालकांचा मुद्दा चर्चेत आला आहे. संसदेच्या दिशेने जाणाऱ्या मोर्चांना पोलिसांकडून परवानगी दिली जात नसल्याने आगामी आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या देशभरातील पेट्रोल पंपांवर मिळणाऱ्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण केले जात आहे. या निर्णयामुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होत असल्याचा दावा टॅक्सी संघटनेकडून करण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी सांगितले की, इथेनॉलचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक वाहनांमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होत आहेत. टॅक्सी, खासगी कार आणि दुचाकी चालकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याच मुद्द्यावरून त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने वाहनचालकांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, E20 पेट्रोलच्या वादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने चुकीची माहिती, डीपफेक व्हिडिओ आणि बदनामीकारक मजकूर पसरवल्याचा दावा त्यांनी केला आहे.
याप्रकरणी त्यांनी मेटा, एक्स आणि गुगलविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो आणि त्याचा आपल्याशी थेट संबंध नसल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. या याचिकेवर 5 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, या आंदोलनाला यश येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







