Iran-America War: मध्यपूर्वेतील देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका महाराष्ट्रातील कृषी निर्यातीला बसू लागला आहे. नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी म्हणजेच जेएनपीए बंदरातून (JNPA Port) आखाती देशांकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून, तिथे फळे आणि भाजीपाल्याने भरलेले सुमारे 1000 कंटेनर अडकून पडले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कांदा, केळी आणि द्राक्षे यांसारख्या नाशवंत मालाचा समावेश आहे. गेल्या शनिवारपासून ही स्थिती निर्माण झाली असून, यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Agriculture Export India)

कृषी व्यापारावर 60 % परिणाम
आखाती देशांमधील सागरी मार्गांवर जहाजांवर हल्ले होण्याचा धोका वाढल्याने अनेक आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी आपली मालवाहतूक तात्पुरती थांबवली आहे. काही जहाजांना तर प्रवासाच्या मध्यातूनच मागे फिरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेएनपीए बंदरातून दर आठवड्याला साधारण 54 जहाजांची ये-जा होत असते, मात्र आता या जहाजांचे वेळापत्रक कोलमडले आहे. इराक, सौदी अरेबिया आणि कतार यांसारख्या देशांमध्ये नियमितपणे होणारी निर्यात ठप्प झाल्याने कृषी व्यापारावर जवळपास 60 टक्के परिणाम झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
निर्यातदारांच्या मते, हा सर्व माल नाशवंत असल्याने तो वेळेत पोहोचणे अत्यंत आवश्यक असते. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर मालाची गुणवत्ता खराब होऊन मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. सध्या शिपिंग कंपन्या आखाती भागात जाण्यास धजावत नसल्याने निर्यातीसाठी तयार असलेला माल बंदरातच साठून राहिला आहे. बंदर प्रशासनातील अधिकारी या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि शिपिंग कंपन्यांशी चर्चा करून पर्यायी मार्गांचा शोध घेत आहेत.
दुसरीकडे, मध्यपूर्वेतील वाढता तणाव पाहता भारत सरकारने तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आखाती युद्धाचा हा परिणाम केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून, त्याचा थेट फटका आता भारतातील सामान्य शेतकरी, व्यापारी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.


