नवी दिल्ली: भारताच्या शेजारील मुस्लिम राष्ट्रांना हाताशी धरून देशाविरुद्ध मोठा कट रचला जात असल्याची खळबळजनक माहिती गुप्तचर सूत्रांकडून पुढे आली आहे. विशेषतः तुर्की आणि पाकिस्तानच्या साठमारीतून दक्षिण आशियात कट्टरता आणि दहशतवाद पसरवण्याचा डाव आखला जात असून, या कटाच्या केंद्रस्थानी बांगलादेश असल्याचे बोलले जात आहे. (Intelligence agency report)

भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी या संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले असून, केंद्र सरकारने या आव्हानाचा सामना करण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे.
तुर्कीकडून बांगलादेशातील कट्टरपंथी संघटनांना निधी
माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार बांगलादेशातून पायउतार झाल्यानंतर बांगलादेशात कट्टरपंथी शक्ती पुन्हा सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. गुप्त सूत्रांनुसार, तुर्की बांगलादेशातील इस्लामिक कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामीला मोठ्या प्रमाणात फंडिंग करत आहे. भारताविरोधात घातपाती कारवाया करण्यासाठी या संघटनेची मदत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुर्कीची गुप्तचर एजन्सी ढाका येथील मोघबाजार भागात जमात-ए-इस्लामीचे नवीन कार्यालय स्थापन करण्याच्या कामात गुंतली असल्याची माहिती समोर आली आहे. जमात-ए-इस्लामीचा नेता सादिक कय्याम याने अलीकडेच तुर्कीची यात्रा केली होती.
एर्दोगन यांचा ‘इस्लामिक एकजूट’ डाव
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तैयप एर्दोगन हे दक्षिण आशियाई देशांमधील इस्लामिक संघटनांना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तुर्की स्कॉलरशिप्स आणि कार्यशाळांच्या माध्यमातून या भागात कट्टरतावाद वाढवण्याचे काम करत आहे. जिहादी विचारधारेचा प्रचार करण्यासाठी तुर्की इस्लामिक संस्थांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे.
ईशान्य भारत आणि केरळवर धोक्याची घंटा
तुर्कीकडून कट्टरपंथी संघटनांना मिळत असलेल्या पाठबळामुळे भारताची ईशान्येकडील राज्ये, जसे की त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, तसेच केरळ सारख्या राज्यांमध्ये जिहादी विचार पसरण्याची भीती आहे.
गुप्त माहितीनुसार, तुर्की पाकिस्तानच्या आयएसआयला देखील आर्थिक मदत पुरवत आहे. बांगलादेशाला हाताशी धरून भारताविरुद्ध मोठे आव्हान उभे करणे आणि देशात दहशतवाद पसरवणे, हा तुर्कीचा मुख्य डाव आहे.
तुर्की आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या सहकार्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.







