मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav And Raj Thackeray) यांनी काल (27 नोव्हेंबर) मनसेप्रमुख (Shivsena) राज ठाकरे यांची (MNS) त्यांच्या शिवतीर्थ (Local Bodies Election) या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये मुंबई महानगरपालिकेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना (ठाकरे गट) राज्यातील सहा महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढणार हे निश्चित झाले आहे. (Breaking News)

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे आणि नाशिक या सहा महानगरपालिकांमध्ये ठाकरे गट आणि मनसेची युती होणार आहे. ठाणे महापालिकेसाठी ठाकरे गटाकडून राजन विचारे आणि मनसेकडून अविनाश जाधव यांच्यावर, तर कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी मनसेचे राजू पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांच्यावर जागा वाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
युती पक्की झाली असली तरी जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मराठीबहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती आहे. मनसेने शिवसेना ठाकरे गटाकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मागणी केली आहे. तसेच, ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांच्या जागांवरही मनसे हक्क सांगत आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची गोची झाली आहे. मात्र, ठाकरे गट संबंधित प्रभागातील मनसेची संघटनात्मक ताकद आणि तगडा उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाम आहे.
दादर, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप आणि जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील जागांवर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे. कालच्या चर्चेत ‘कोण कुठून लढणार’ यावर अंतिम तोडगा निघालेला नाही. निवडून येऊ शकणाऱ्या एकेका जागेवर सखोल चर्चा होत असल्याने जागा वाटपासाठी ठाकरे बंधूंमध्ये आणखी काही बैठका होण्याची शक्यता आहे.






