मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. महाराणी ताराराणी यांच्याबद्दलच्या विधानावरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच, आता जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि भाजप नेते नितेश राणे यांची तुलना केल्याने राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

एका सार्वजनिक कार्यक्रमात नितेश राणे यांच्या उपस्थितीत बोलताना जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. मात्र, हे कौतुक करताना त्यांनी मर्यादा ओलांडल्याचा आरोप होत आहे. “नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखीच आहे,” असे विधान त्यांनी केले. इतकेच नव्हे, तर राणे यांची आक्रमकता ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी असून, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. आराध्य दैवत असलेल्या शिवरायांची तुलना एका राजकीय नेत्याशी केल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कडक शब्दात टिका केली असून “या जैन मुनींचे डोके सडले आहे का? यांना फटके खायचे आहेत का?” असे म्हणत संताप व्यक्त केला. “आमच्या दैवतावर असे बोलत असाल, तर आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
जैन मुनींनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “जरांगे यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. मी सनातनी असून गोरक्षणाचे काम करतो.” मात्र, त्यांनी ‘मुंब्रा हिरवा करणाऱ्यांना फटके मारा’ असे प्रत्युत्तर दिल्याने या वादाला आता धार्मिक आणि राजकीय रंग चढू लागला आहे.







