मुंबई: मुंबईतील वरळी डोम येथे पार पडलेल्या (Sunetra Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत नव्याने राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी (Ajit Pawar Death) भावनिक भाषण केले. अजित पवार यांच्या आठवणीने व्यासपीठावरच त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
“अजितदादांच्या जाण्यानंतर प्रत्येक क्षण वेदनादायी आहे. मात्र अध्यक्षपद स्वीकारणे म्हणजे लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणे आहे. मी पक्षाचा विचार पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे त्या म्हणाल्या. “40 वर्षे संसार केलेल्या त्या वादळाची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही. पण त्यांच्या विचारांवर पावले टाकून आपल्याला पक्ष पुढे न्यायचा आहे,” असे कणखर शब्दांत त्यांनी सांगितले.
या बैठकीस प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ तसेच आदिती तटकरेयांच्यासह विधानसभा आणि विधानपरिषदेतील सर्व आमदार, राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार यांच्या अकाली जाण्यानंतर पक्षासमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा उल्लेख करत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “संकटाच्या काळात त्यांनी पक्ष नेटाने उभा केला. पण संकटाशी लढणारा तो सह्याद्री आता आपल्या सोबत नाही. त्यांची स्वप्ने अपुरी राहू देणार नाही. राष्ट्रवादीला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे.” भावनिक वातावरणात झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्ष एकसंध ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.







