मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र अजूनही सावरलेला नसतानाच, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सज्ज झाल्या आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला असून, आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

अजितदादांच्या जाण्याने केवळ कुटुंबातच नव्हे, तर पक्षात आणि सत्तेत मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार आपल्या दोन्ही मुलांसह (पार्थ आणि जय पवार) मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. सुनेत्रा पवार केवळ उपमुख्यमंत्रीच होणार नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रेही त्यांच्याकडेच राहतील, अशी दाट शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही दोन महत्त्वाची खाती सोपवली जाणार आहेत. मात्र, राजकारणातील सर्वात मोठी चर्चा ही ‘अर्थखात्या’ची आहे. अनेक वर्षांपासून अजितदादांकडे असलेले वित्त आणि नियोजन (अर्थखाते) आता भाजपकडे जाणार असल्याची माहिती आहे. दादांनी या अर्थसंकल्पाची (बजेट) जय्यत तयारी केली होती, परंतु आता हे बजेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सादर करण्याची शक्यता आहे.







