पुणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कथित पक्षांतराच्या चर्चेवरून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, ओमराजे निंबाळकर यांचे वडील आणि माजी आमदार पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाच्या निकालाचा संदर्भ देत अंधारे यांनी मोठा आरोप केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना अंधारे म्हणाल्या की, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल 20 जून रोजी अपेक्षित आहे. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेत बदल होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या निर्णयामागे कोणते राजकीय आश्वासन किंवा दबाव आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“ओमराजे निंबाळकर यांना या प्रकरणाबाबत काही आश्वासन देण्यात आले आहे का? त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांना काही राजकीय हमी देण्यात आली आहे का? किंवा राजकीय विरोधकांपासून संरक्षणाचे आश्वासन मिळाले आहे का?” असे प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केले.
अंधारे यांनी कोणतेही ठोस पुरावे न देता संशय व्यक्त केला असला, तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण आणि सध्याच्या राजकीय घडामोडी यांचा काही संबंध आहे का, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर किंवा संबंधित नेत्यांकडून अंधारे यांच्या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, त्यांच्या या विधानामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या राजकीय चर्चेला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.







