मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बुधवारी (ता. 18) ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याने राज्याच्या (Maharashtra Politics) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित भेटीनंतर विविध राजकीय चर्चा (Shivsena) रंगल्या असून आगामी महापालिका निवडणुकांच्या (MNS) पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

या भेटीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष बोचरी टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “माझा पक्ष पळवला… माझा बाप पळवला… आता माझा भाऊ पळवला!!!” असे लिहून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो शेअर केला. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
तसेच शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले की, “काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांची भेट झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला. परंतु बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल.”
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. तसेच राज ठाकरे यांनीही महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहील, असे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीत केडीएमसी निवडणुकांसह आगामी राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या भेटीमुळे महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांमध्येही हालचाली सुरू झाल्याचे दिसत असून, पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात नवे समीकरण उभे राहण्याची चिन्हे आहेत.







