मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. “महाराष्ट्रात २०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील,” असा ठाम दावा बावनकुळे यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

हे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विधानानंतर समोर आले आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस भविष्यात केंद्राच्या राजकारणात जाऊ शकतात आणि अशा परिस्थितीत चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राज्यात आमचे अष्टपैलू आणि कर्तृत्ववान नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे की देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करावे. त्यामुळे २०३४ पर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील.”
बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका आणि महायुतीतील नेतृत्वाबाबतच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. विरोधकांच्या दाव्यांवर भाजपकडून स्पष्ट भूमिका मांडत फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे बावनकुळे यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, बावनकुळे यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, यावर महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







