ajit pawar death : बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्याच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि निर्णायक नेतृत्व हरपल्याने कार्यकर्ते, समर्थक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र या दुर्दैवी घटनेनंतर शोकासोबतच अनेक प्रश्न आणि संशयही पुढे येत आहेत. (ajit pawar death)

अपघातानंतर सुरुवातीला विमानात सहा प्रवासी होते आणि सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र घटनास्थळी पाच मृतदेहच सापडल्याचे सांगितले जात असल्याने संशयाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा उचलून धरत “सहावा प्रवासी कोण होता?” असा थेट सवाल केला. यामुळे हा अपघात केवळ तांत्रिक कारणांमुळे झाला की यामागे काही वेगळं कारण आहे, यावर चर्चा सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी संशयांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. निकम यांच्या मते, विमानात सहा प्रवासी होते, हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा सध्या उपलब्ध नाही. अपघातग्रस्त विमानात मोठ्या प्रमाणावर इंधन असल्यामुळे मृतदेह अत्यंत जळालेल्या अवस्थेत सापडणे ही दुर्दैवी पण तांत्रिकदृष्ट्या शक्य बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. “विनाकारण संशय निर्माण करून या घटनेला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न होतो आहे,” असा इशाराही त्यांनी दिला. कटाचा आरोप करायचा असेल तर त्यासाठी किमान प्राथमिक पुरावे आवश्यक असतात आणि ते अद्याप समोर आलेले नाहीत, असंही निकम यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे, अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावनिक आणि आक्रमक प्रतिक्रियेमुळे वातावरण अधिक तापलं आहे. “दादा असे सहज जाऊ शकत नाहीत,” असा दावा करत त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
हे प्रकरण महत्त्वाचे ठरण्याचं कारण म्हणजे, अजित पवार हे सत्तास्थापनेत आणि राज्याच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावत होते. त्यांच्या निधनानंतर केवळ राजकीय समीकरणेच बदलणार नाहीत, तर या अपघाताभोवती फिरणाऱ्या संशयांमुळे सरकारची विश्वासार्हता आणि तपास यंत्रणांची भूमिका यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या घटनेवर पारदर्शक आणि विश्वासार्ह तपास होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







