पुणे : गर्लफ्रेंडशी बोलल्याचा राग अनावर झाल्याने 28 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे . मात्र, 112 क्रमांकावर आलेल्या कॉलमुळे पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि स्कॉर्पिओचा पाठलाग करून तरुणाची सुखरूप सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद सूर्यवंशी याचे मध्यरात्री काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून अपहरण करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी वाहनाचा माग काढत पाठलाग सुरू केला. पहाटे सव्वा एकच्या सुमारास वाहन अडवून प्रसादची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी सागर रमेश बोराडे आणि किशोर बाळासाहेब सावंत यांना अटक करण्यात आली असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, प्रसाद हा बोराडेच्या गर्लफ्रेंडशी बोलत असल्याने संतापलेल्या बोराडेने साथीदारांच्या मदतीने त्याला मारहाण केली आणि त्याचे अपहरण केले. प्रवासादरम्यानही मारहाण सुरूच होती.

विशेष म्हणजे, प्रसाद आणि आरोपीची गर्लफ्रेंड दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. क्षणिक संतापाचे पर्यवसान थेट अपहरण आणि मारहाणीत झाल्याने या प्रकाराने पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






