पुणे : जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी (ता. १२) रोजी दौंड तालुक्यात येत असून दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्काम यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी होणार असून पालखी स्वागतासाठी यवत नगरी सज्ज झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासन व यवत ग्रामस्थांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

पालखी बरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत ,महसूल, आरोग्य, महावितरण, पोलीस यांसह सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. निर्मल वारी अभियानांतर्गत ठिकठिकाणी मोबाईल शौचालये, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल चार्जिंग, वीजपुरवठा, स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायत हद्दीत १७ ठिकाणी १२०० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह उभारण्यात आले असून, वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे तर विविध ठिकाणी आर.ओ. प्लांटमधून मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतचे वारकरी सेवेला प्राधान्य
यवत ग्रामपंचायतीने आठवडा बाजार मैदान, गावठाण, गावातील प्रमुख रस्ते, प्राथमिक शाळा व हायस्कूलचे मैदान, तसेच गावातील सर्व मंदिरांची विशेष स्वच्छता करून परिसर सुशोभित केला आहे.प्लास्टिकमुक्त, प्रदूषणमुक्त आणि हरित पालखी सोहळ्यासाठी कचराकुंड्या ठेवण्यात येणार असून परिसर स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे प्रशासक समीर दोरगे व ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी सांगितले.
पावसाची शक्यता लक्षात घेऊन वारकऱ्यांसाठी जर्मन हँगर (वारकरी सेवा केंद्र) उभारण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने इतर विभागाची अपूर्ण कामे देखील पूर्ण करून वारकऱ्यांना कोणतीही समस्या येणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
पालखी आगमनानंतर वारकऱ्यांसाठी आवडीचा असलेला पिठल् भाकरी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात आले असून ग्रामीण रुग्णालय यवत, प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव यांच्या वतीने आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.वारकऱ्यांना तातडीची उपचार सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पत्की यांनी सांगीतले.ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी दोन दिवस दौंड तालुक्यात असल्याने यवत पोलीस प्रशासनाने यवत
आणि वरवंड तसेच दौंड तालुक्याच्या हद्दीपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन दिवस पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासन व यवत पोलीस ठाणे सज्ज झाले आहेत. १ अप्पर पोलीस अधीक्षक, ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १४ पोलीस निरीक्षक, ७५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २७० महिला पोलीस यांसह ८०० हुन अधिक अंमलदार, ६७७ होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या, दंगल नियंत्रक पथके यांसह एनसीसीचे विद्यार्थी असा सुमारे १४६८
हून अधिक पोलीस आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवक संस्थेची पथके असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली.







