पुणे : पत्नीपासून आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी पुण्यातील एका व्यापाऱ्याने रचलेला बनाव शेवटी त्याच्यावरच उलटला आहे. स्वतःच्या सुटकेसाठी रचलेल्या खोट्या कथेमुळे पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला अन् अखेर या 46 वर्षीय व्यक्तीला पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व सत्य उघड करावे लागले.

पुण्यातील एक व्यावसायिक आपल्या एका महिला मैत्रिणीसोबत क्वालालंपूरला फिरायला निघाला होता. मात्र, घरच्यांना संशय येऊ नये म्हणून त्याने कंपनीच्या कामासाठी परदेशात जात असल्याचे पत्नीला सांगितले. दोघेही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. मात्र, तेथे इमिग्रेशन तपासणीदरम्यान त्याच्या मैत्रिणीचा पासपोर्ट जुना आणि पूर्वी हरवलेला असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे अधिकाऱ्यांनी त्या महिलेला तेथेच रोखले.

आपल्यासोबत दुसरी महिला असल्याचे पत्नीला कळेल या भीतीने व्यापाऱ्याने त्वरित तो दौरा रद्द केला. त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला आणि त्या महिलेला घेऊन सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळ काढला.

स्थानकावर जाण्यापूर्वी, विमानतळावरील लँडलाईनवरून त्याने पत्नीला फोन केला. “इमिग्रेशन विभागात काही अडचण आल्याने माझा फोन जमा केला जात आहे,” असा बहाणा त्याने केला. दुसऱ्या दिवशी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरूनही त्याने हाच बनाव कायम ठेवला. त्यानंतर त्याचा फोन पूर्णपणे बंद झाला. पती संकटात असल्याचे वाटल्याने चिंतीत झालेल्या पत्नीने तातडीने पोलिसांत धाव घेऊन पतीच्या अपहरणाची तक्रार नोंदीवली.
आपल्याविरोधात अपहरणाचा FIR दाखल झाल्याची माहिती मिळताच घाबरलेला तो व्यापारी स्वतःहून सहार पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर कबूल केला.या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, गैरसमजातून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता न्यायालयात या खटल्याचा ‘सी-समरी’ अहवाल सादर करून ही केस अधिकृतपणे बंद केली जाणार आहे.







