पुणे : नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या आंदोलनाला राष्ट्रविरोधी ठरवत विद्यार्थ्यांवर टीकेची झोड उठवली. मात्र, याच पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या पाल्यांनी उघडपणे विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्याने सरकारची गोची झाली आहे.यात सर्वात चर्चेत आलेले नाव म्हणजे उत्तर प्रदेशातील माजी भाजप आमदारांची मुलगी आणि प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर यशस्विनी राजे सिंह.

यशस्विनीने थेट जंतर-मंतरवर पोहोचून विद्यार्थ्यांच्या या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. मात्र त्याचबरोबर आंदोलनाचा तणाव वाढल्याने तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी प्रह्लाद जोशी यांची नवे शिक्षण मंत्री म्हणून वर्णी लागली. या निर्णयावर यशस्विनीने सणसणीत टोला लगावत म्हणाली, “हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा आहे.” असं म्हटलं आहे.

दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर टीका करताना ती म्हणाली की, त्यांच्या पत्रात घोटाळ्याचा किंवा त्यामुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांबद्दल कोणताही पश्चाताप दिसला नाही. सत्ताधारी नेत्यांची मुलेच आता सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत असल्याने या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली आहे.
नीट परीक्षेतील घोटाळा आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे ‘जेन झी’ युवा वर्ग 20 जूनपासून रस्त्यावर उतरला होता. तब्बल 36 दिवस हे आंदोलन चालले. 20 जुलै रोजी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार आणि पेलेट गनचा वापर केल्याचा गंभीर आरोप झाला, ज्यामुळे संतापाची लाट पसरली. अखेर वाढत्या दबावापुढे झुकत 25 जुलै रोजी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या.





