मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ‘आयआयटी मुंबई’ कॅम्पसमध्ये एका दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव साहिल वाकोडे असून तो ‘एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग’ विभागात शिक्षण घेत होता. शुक्रवारी संध्याकाळी त्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आयुष्य संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पार पडलेल्या ‘मिड-सेमिस्टर’ परीक्षेदरम्यान साहिल मोबाईल वापरताना पकडला गेला होता. त्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका ‘ChatGPT’ या AI ॲपवर अपलोड केल्याचा आरोप त्याच्यावर झाला. यानंतर प्राध्यापक आणि विभाग प्रमुखांनी त्याच्याशी चर्चा करून त्याला निलंबित केले होते. या घटनेनंतर दुपारी परीक्षा संपल्यावर साहिल आपल्या खोलीत गेला आणि संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तो मृतावस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती पसरताच कॅम्पसमधील विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले. सुमारे 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने मुख्य दारे बंद केल्यामुळे कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी डीन आणि संचालकांच्या राजीनाम्याची मागणी करत आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. संस्थेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

आयआयटी मुंबईत ‘स्टुडंट वेलनेस सेंटर’ कार्यरत असतानाही गेल्या सात महिन्यांतील आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2026 आणि जुलै 2026 मध्येही दोन विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे विद्यार्थ्यांमधील मानसिक ताणतणाव आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.याप्रकरणी असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफार्मस दाखल करण्यात आला आहे.
सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून साहिलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे







