ST Bus : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या विविध समस्या, तक्रारी आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यापैकी सर्वाधिक दिलासादायक निर्णय म्हणजे एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता पत्नीसमवेत वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या बैठकीत सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने चालक-वाहकांवरील कारवाई, आगार स्तरावरील व्यवस्थापनातील अडचणी, तसेच काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे आणि त्यांचे प्रश्न वेळेत सोडवणे हेच एसटी प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत 3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले. या बदल्यांमुळे प्रशासनात पारदर्शकता वाढेल आणि कामकाज अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
एसटी ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी ग्रामीण भागातून शहरांकडे आणि शहरातून गावांकडे प्रवासासाठी एसटीवर अवलंबून असतात. त्यामुळे चालक-वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करणे आवश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. काम करताना शिस्तभंग कारवाई, निर्णयप्रक्रिया आणि प्रशासनिक बाबी न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने हाताळण्याचेही निर्देश देण्यात आले.
कर्मचारी संघटनांशी नियमित संवाद ठेवून त्यांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीतील निर्णयांमुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







