Solapur : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागताच सोलापूरच्या राजकीय आखाड्यात आरोप-प्रत्यारोपांच्या धुराळा उडाला आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणावरून आता भाजप आणि मोहिते-पाटील समर्थक समोरासमोर आले असून, ‘मुर्दाडाला कोण मारणार?’ या उत्तम जानकरांच्या विधानाने या वादात तेल ओतले आहे.

नेमका आरोप काय?
राम सातपुते यांनी थेट खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर या कटाचे ‘मास्टरमाईंड’ असल्याचा आरोप केला आहे. सातपुते यांच्या दाव्यानुसार, ही एक ‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’ची योजना होती. “पोलिसांना या कटाची कुणकुण आधीच लागली होती, म्हणूनच गेल्या तीन दिवसांपासून पोलीस माळशिरसमध्ये तळ ठोकून आहेत. मी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्र्यांना एक पत्र दिले आहे,” असे सातपुते यांनी स्पष्ट केले.
‘मुर्दाड माणसाला कोण मारणार?’ – जानकरांचा टोला
भाजपच्या या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी अत्यंत तिखट भाषेत समाचार घेतला. सोलापुरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ धराधरी होते, त्याला हत्येचा कट म्हणणे चुकीचे आहे. सातपुते यांनीच बाबा माने यांच्या तोंडावर गुलाल उडवून आगावपणा केला, त्यातून वादावादी झाली. मुळात, अशा मुर्दाड माणसाला मारायला कोण कशाला येईल?” जानकरांच्या या उपरोधिक टीकेमुळे भाजपची कोंडी झाली आहे.
मोहिते-पाटील गटाचे ‘वैफल्यग्रस्त’ लेबल
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माढा मतदारसंघात सपाटून पराभव झाल्यामुळे राम सातपुते आणि जयकुमार गोरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच ते मोहिते-पाटील घराण्यावर असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. सातपुते यांच्या बुद्धीवर निवडणुकीच्या निकालाचा परिणाम झाला आहे,” असे चोख प्रत्युत्तर त्यांनी दिले.
१. जिल्ह्याचे वर्चस्व: जिल्हा परिषद निकालानंतर सोलापूरच्या ग्रामीण भागावर कोणाचे वर्चस्व राहणार, यावरून ही लढाई सुरू आहे. २. सुरक्षेचा प्रश्न: जर खरोखरच लोकप्रतिनिधीच्या हत्येचा कट असेल, तर ती कायदा-सुव्यवस्थेची गंभीर स्थिती आहे. ३. मोहिते-पाटील विरुद्ध भाजप: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील आणि भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.







