सातारा : साताऱ्यातील शिवधर गावात राहणाऱ्या विवाहितेची राहत्या घरी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिलेस पूजा जाधव (वय अंदाजे ३०) असे ओळखले जात असून, या प्रकरणी अक्षय साबळे (रा. शिवधर, सध्या पुणे) या तरुणास पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पुण्यातून अटक केली आहे.

प्राथमिक तपासानुसार, आरोपी अक्षय आणि पूजा यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. अक्षयने तिला लग्नासाठी विचारले होते आणि तिच्या मुलाची जबाबदारी घेण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, पूजाने आधीच गावातील प्रथमेश जाधव याच्याशी २०१७ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यामुळे तिने लग्नास नकार दिला. या नकारामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.
घटनेच्या दिवशी, ७ जुलै रोजी दुपारी, पूजाचे कुटुंबीय शेतात होते आणि नवरा कामावर गेला होता. पूजा घरी एकटी असल्याचे पाहून अक्षयने घरात घुसून तिच्याशी पुन्हा लग्नाच्या विषयावर वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर अक्षयने चाकूने पूजाचा गळा चिरून तिचा खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. गावातील काही लोकांना पूजाचे आरोपी अक्षय सोबतचे संबंध असल्याची पूर्वीच कल्पना होती. त्यामुळे घटनेनंतर पोलिसांना संशयाचा काटा सरळ अक्षयवर गेला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून, फक्त १२ तासांत पुण्यातून आरोपीला ताब्यात घेतलं.
तपासादरम्यान, पूजाचे गावातीलच आणखी एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले असून, पोलीस तपास अधिक गडद होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सातारा ग्रामीण पोलीस करत आहेत.







