अमित मुंडीक

पुणे: शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक (Pune News) संकुले आणि निवासी भागांमध्ये (Pune Bornfire News) थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक व कामगार शेकोट्या पेटवताना दिसतात. यासाठी बहुधा लाकूड, कचरा, कोळसा किंवा बायोमास जाळला जातो. यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे पुणे शहरातील हवा प्रदूषणात वाढ होत असून, नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. (PMC Breaking News)
शेकोट्यांमधून निर्माण होणारा धूर, कार्बन मोनोऑक्साइड, PM 10 व PM 2.5 सारखे सूक्ष्म कण श्वसनावर परिणाम करतात. यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसनविकारांचा धोका लक्षणीय वाढतो, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हवा गुणवत्तेतील बिघाड रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने “हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, 1981” व “घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016” अंतर्गत उघड्यावर कचरा, प्लास्टिक, रबर, बायोमास किंवा कोळसा जाळण्यास स्पष्ट मनाई केली आहे. तसेच पर्यावरण मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाच्या (NCAP) मार्गदर्शक तत्त्वांतही यावर बंदीची तरतूद आहे.
या सर्व नियमांच्या अंमलबजावणीसाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कडक भूमिका घेतली आहे. सोसायटी परिसरात किंवा रस्त्यावर शेकोटी पेटवताना कोणताही सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, मनपा कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार आढळल्यास त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे. शहरातील हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.






