पुणे : अंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते अंतरवली सराटीत दाखल झाले असून जरांगे यांनी रात्रीपासून वैद्यकीय उपचार, पाणी आणि सलाईन घेणे पूर्णपणे बंद केले आहे.सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत त्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.

58 लाख कुणबी नोंदींची प्रक्रिया सुरू करणे, हैदराबाद गॅझेटची वैधता लागू करणे आणि गावांमध्ये दवंडी पिटणे या विषयांवर प्रशासनाकडून ठोस हालचाली झालेल्या नाहीत, असे जरांगे यांचे म्हणणे आहे. तसेच 2012 च्या जात पडताळणी नियमावलीत मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासनही अद्याप अपूर्णच आहे.

या सर्व कारणांमुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनी सर्व मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होईपर्यंत कोणताही उपचार न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. उपचार नाकारल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत राज्यभरातील मराठा समाजात आणि आंदोलकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

आता मनोज जरांगे यांच्या या निर्णयामुळे आंदोलनातील तणाव वाढला असून, आता राज्य सरकार यावर काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






