मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी झालेल्या महायुतीच्या अंतर्गत बैठकीत मोठी राजकीय घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांना कठोर शब्दांत सूचना दिल्याचे समजते. कामगिरीत सुधारणा न झाल्यास भविष्यात मंत्रिपदात बदल केले जाऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिल्याची चर्चा आहे.

दर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते. या बैठकीपूर्वी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका घेतल्या जातात. याच पूर्व बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या चार मंत्र्यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

“जनतेची कामे प्राधान्याने करा आणि आपल्या मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. अन्यथा नेतृत्व बदलाचा निर्णय घ्यावा लागू शकतो,” अशा शब्दांत शिंदे यांनी संबंधित मंत्र्यांना सुनावल्याचे सांगितले जात आहे.

विदर्भ, वाशीम, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर देण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, नाराजी व्यक्त करण्यात आलेले हे चार मंत्री नेमके कोण आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचे पद जाणार, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांच्या प्रशिक्षण शिबिरातही लोकप्रतिनिधींना कामाबाबत स्पष्ट संदेश दिला. लोकप्रतिनिधींनी केवळ उपस्थिती लावण्यापेक्षा सभांमध्ये सहभागी होऊन शिकण्याची वृत्ती ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
स्वतःच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा मेहनत आणि जनसेवेमुळे शक्य झाला. त्यामुळे प्रत्येक पदावर असलेल्या व्यक्तीने प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याला महत्त्व दिले पाहिजे.
नगरसेवक हा भागाचा मालक नसून जनतेचा सेवक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडून आल्यानंतर प्रभाग आपली खासगी मालमत्ता असल्यासारखे वागू नये. जनतेने दिलेली संधी ही जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.







