पुणे : पदवीचे शिक्षण पूर्ण करून भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका 21 वर्षांच्या तरुणाचा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला असून या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रिद्धेश विनय शिंदे (वय 21, रा. जयभीमनगर, दापोडी) असे अपघातग्रस्त तरुणाचे नाव आहे. नुकताच तो B.Sc ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. 17 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8:30 वाजता रिद्धेश आपल्या दुचाकीवरून दापोडी येथील घराच्या दिशेने जात होता.दापोडीच्या दिशेने चाललेल्या PMPML बसला पुढे जाऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न रिद्धेश करत होता. त्याच वेळी वळणावर बसचालकाने अचानक गाडी वळवल्यामुळे दुचाकीला जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत रिद्धेश वाहनासह रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळला आणि त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

वाकडेवाडी परिसरातील भुयारी मार्गाजवळ हा अपघात घडला.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. ऐन तारुण्यात मुलाचा असा करुण अंत झाल्याने शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी मृत तरुणाचे वडील विनय शिंदे (वय 45) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रेखा दिघे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
रस्त्यावरील ओव्हरटेकिंग आणि अपुरे भान यामुळे एका उमद्या तरुणाचा बळी गेल्याने वाहनचालकांनी वळणावर आणि वेगावर नियंत्रण ठेवणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.







