महाराष्ट्र : मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात पावसाने (Cyclone Shakti) हाहाकार माजवला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, विशेषतः मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि जालना अशा दुष्काळग्रस्त भागांमध्येही यंदा पावसामुळे पूर आला आहे. अशापरिस्थितीत शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसात अनेकांचे संसार पाण्यात गेले आहेत. अशातच अनेक ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या संकटातून शेतकरी सावरत नाहीत तोच, आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचे नवे संकट राज्यावर घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ 7 ऑक्टोबरपर्यंत धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील नैसर्गिक आपत्तीतून सावरत असतानाच या नव्या संकटाने राज्यातील नागरिकांची चिंता आणखीनच वाढवली आहे.







