पुणे : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या 4 थ्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे शासकीय वर्तुळात मोठी धावपळ उडाली आहे. शासन स्तरावरून जरांगे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत.तर दुसरीकडे, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजदेखील आक्रमक झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये या मागणीसाठी ओबीसी आंदोलकांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे लक्ष्मण हाके म्हणाले की, आम्ही 1001 टक्के मुंबईला जाण्यावर ठाम आहोत.
मुंबईच्या दिशेने निघालेला ओबीसींचा एल्गार मोर्चा पुणे येथे पोहोचताच पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून त्यांना अडवले. पोलिसांच्या या कारवाईनंतर लक्ष्मण हाके यांनी सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील लोक जरांगे पाटील यांच्या सतत संपर्कात असतात, पण ओबीसींच्या मागण्या ऐकून घ्यायला कोणालाही वेळ नाही, असा राग त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, या ओबीसी आंदोलनात अंतर्गत मतभेद आणि फूट पडली आहे. ओबीसी नेते बबनराव तायडे यांनी या मोर्चापासून स्वतःला वेगळे केले आहे. लक्ष्मण हाके यांच्या मोर्चातील मागण्या स्पष्ट नसल्यामुळे ‘राष्ट्रीय ओबीसी महासंघ’ या आंदोलनात सहभागी होणार नाही आणि आमचा याला पाठिंबा नाही, असे तायडे यांनी स्पष्ट केले.

एकिकडे मराठा समाजाचा लढा आणि दुसरीकडे ओबीसींचे आंदोलन, यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून फडणवीस सरकारसमोरील अडचणीत मोठी वाढ झाली आहे.






