Bangalore : बंगळुरू (Bangalore) शहरात रात्री पावणे बाराच्या सुमारास एक घटना घडली. एक तरुणीने रात्री ११: ४५ च्या सुमारास घरी जाण्यासाठी रॅपिडो बाईक बुक केली. तिला आहे त्या अंतरावरुन तब्बल ३८ किलोमीटरचा प्रवास करायचा होता. आशा माने असं या मुलीचं नावं आहे. तिने तिच्या इंस्टा अकाऊंटवरुन तिचा त्या रात्री घडलेल्या घटनेचा अनुभव सांगितला आहे.

‘त्या’ रात्री काय घडलं होतं?
आशा माने हीने घरी जाण्यासाठी रॅपिडो बाईक बुक केली. पिवळ्या रंगाचे जॅकेट घातलेला रॅपिडो कॅप्टन लोकेशनच्या ठिकाणी पोहोचला. आशा म्हणाली, “मला लवकर घरी पोहोचायचं आहे.” रायडरने हसून उत्तर दिले, “नक्कीच, मॅडम, काळजी करू नका” आणि प्रवास सुरू झाला. पण काही किलोमीटर प्रवास झाल्यावर रस्त्याच्या एका निर्जन आणि अंधाऱ्या टप्प्यावर अचानक बाईकची चेन तुटली आणि बाईक थांबली. आजुबाजूला रस्त्यावर कोणीच नव्हते, फोनमध्ये फक्त ६% बॅटरी शिल्लक होती आणि सगळीकडे अंधार पसरला होता. कोणताही मुलगी या क्षणी जशी घाबरून जाईल, तशी आशाही घाबरली. तिला वाटले की, आता रायडर राईड कॅन्सल करेल आणि या भयानक अंधारात ती एकटी पडेल. ती भेदारलेल्या अवस्थेत असताना तिला रायडरने धिर देत. तिला विश्वास पटवून दिला की तिच्या सोबत काही वाईट घडणार नाही. तो आशाला म्हणाला, “काळजी करू नकोस, आपण हे दुरुस्त करू. मी तुला घरी सोडतो.” यानंतर, रायडरने रस्त्याच्या कडेला बसून, चेन दुरुस्त करायला सुरुवात केली. आशाने तिच्या फोनचा टॉर्च चालू केला. या अवघड परिस्थितीतही, रायडरने कोणताही राग किंवा तक्रार न करता शांतपणे काम सुरू ठेवले. ‘कोणतीही तक्रार नाही, राग नाही… फक्त दोन अनोळखी लोक मध्यरात्री एकत्र काम करत होते, एकमेकांवर विश्वास ठेवत होते,’ असे आशाने नंतर सांगितले. १० मिनिटांच्या प्रयत्नानंतर बाईक पुन्हा चालू झाली. रायडर उठला, हात धुतले आणि हसत म्हणाला, “चला जाऊया मॅडम. तुम्हाला घरी जायचं आहे.” त्याने दिलेले वचन पाळले. रात्री १ वाजेपर्यंत आशा तिच्या घरी सुरक्षितपणे पोहोचली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आशाने सोशल मीडियावर पोस्ट केला आणि ‘सर्व पुरुष सारखे नसतात’ असे सांगत त्या रायडरचे आभार मानले.
या रायडरनं फक्त सुरक्षितता दिली असं नाही, तर वेळ न दवडता मदत करून खरी माणुसकी काय असते ते दाखवून दिलं. रात्री काम करणाऱ्या सामान्य लोकांमध्येही किती संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा असू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण ठरलं. त्याच्या या प्रामाणिक वागण्यामुळे बंगळूरकरांच्या मनात त्याच्याबद्दल मोठा आदर निर्माण झाला आहे. खऱ्या अर्थानं त्यानं माणुसकीचं जबरदस्त उदाहरण घालून दिलं.






