पुणे : पीएम केअर्स फंडातील पडून राहिलेल्या अब्जावधी रुपयांच्या वापरावरून आता राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. कोकरोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करत या निधीचा वापर देशातील शिक्षण व्यवस्थेच्या विकासासाठी करण्याची मागणी केली आहे.

दिपके यांच्या दाव्यानुसार, पीएम केअर्स फंडात सध्या सुमारे 8,452 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. देशात एकीकडे एवढा मोठा निधी विनावापर पडून आहे, तर दुसरीकडे ग्रामीण व शहरी भागातील अनेक सरकारी शाळांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, बसण्यासाठी बेंचेस आणि चांगल्या रस्त्यांसारख्या प्राथमिक सुविधांचीही तीव्र टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर हा निधी तसाच ठेवून देणे अत्यंत दुर्दैवी असल्याटी टीका त्यांनी केली आहे.

एका अत्याधुनिक मॉडेल हायस्कूलच्या उभारणीसाठी जर 8 कोटी रुपयांचा खर्च येत असेल, तर या पडून असलेल्या रकमेतून देशभरात 1,000 पेक्षा जास्त उच्च दर्जाच्या शाळा उभारल्या जाऊ शकतात, असे गणित दिपके यांनी मांडले. देशातील मुलांच्या भविष्याशी आणि शिक्षणाशी जोडलेला हा महत्त्वाचा विषय असून, या निधीचा विनियोग तातडीने शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी केला गेला पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला आहे.

हा सर्व पैसा देशातील सामान्य जनतेचा असून तो नागरिकांच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठीच वापरला जावा, अशी मागणी नागरिकांनी पंतप्रधानांकडे लावून धरावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. पंतप्रधानांनी या मोठ्या निधीचा योग्य वापर करून दाखवावा आणि देशवासीयांप्रती असलेली आपली बांधिलकी सिद्ध करावी, अशी अपेक्षा दिपके यांनी व्यक्त केली आहे.







