पुणे: सोशल मीडियावर सध्या १५ दिवसांत किंवा अगदी काही दिवसांतच झपाट्याने वजन कमी करण्याचे अनेक दावे पाहायला मिळतात. अनेक फिटनेस इन्फ्लुएन्सर आणि चॅनेल्सवर १५ दिवसांत ५ ते १० किलो वजन घटवण्याचे जादुई फॉर्म्युले सांगितल्याचे दिसते. परंतु, शास्त्रीयदृष्ट्या आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे दावे कितपत खरे आहेत आणि १५ दिवसांत नेमके काय बदल घडू शकतात, याबाबतची सविस्तर माहिती समोर आली आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, १५ दिवसांत अतिशय वेगाने वजन कमी करणे हे शरीरासाठी नेहमीच सुरक्षित असतेच असे नाही. जेव्हा कोणी अचानक अत्यंत कडक डाएट किंवा क्रॅश डाएट करून काही दिवसांत जास्त वजन घटवण्याचा दावा करते, तेव्हा शरीरातील खरं तर चरबी (Fat) कमी झालेली नसते, तर शरीरातील पाण्याचे प्रमाण (Water Weight) कमी झालेले असते.

अचानक खाण्यापिण्यात मोठी कपात केल्याने शरीराला अपुरी पोषणतत्वे मिळतात, ज्यामुळे स्नायूंचे नुकसान (Muscle Loss) होऊ शकते आणि प्रचंड थकवा जाणवू शकतो. त्यामुळे अल्पावधीत होणारी ही घट आरोग्यासाठी घातक ठरू शकते असा इशारा तज्ज्ञ देतात.

जर तुम्ही योग्य आणि संतुलित आहार घेतला, प्रक्रिया केलेले अन्न व साखर पूर्णपणे टाळली, तसेच नियमित ४५ मिनिटे व्यायाम किंवा चालण्याची सवय ठेवली, तर १५ दिवसांत शरीराचे वजन १ ते २ किलोपर्यंत नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धतीने कमी होऊ शकते. तसेच यामुळे पोटाची फुगलेली चरबी (Bloating) कमी होऊन शरीर हलके आणि ऊर्जावान वाटू शकते.
निरोगी शरीरासाठी महत्त्वाच्या टिप्स:
-
हायड्रेटेड राहा: दिवसभरात पुरेसे पाणी पिण्यामुळे चयापचय (Metabolism) सुधारतो आणि कॅलरी जळण्यास मदत होते.
-
डिटॉक्स पेयांचा वापर: सकाळी जिऱ्याचे पाणी, ओव्याचे पाणी किंवा कोमट लिंबू-मध पाणी घेतल्याने पचनक्रिया सुधारते.
-
झोप आणि ताणतणाव नियंत्रण: पुरेशी झोप न घेणे हे देखील वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे, त्यामुळे हॉर्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी वेळेवर झोपणे गरजेचे आहे.
कोणताही टोकाचा डाएट किंवा औषधांचा मारा करण्याऐवजी संतुलित जीवनशैली आणि पौष्टिक आहाराचा अवलंब करणे हेच दीर्घकाळ वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.







