पुणे: पुणे शहरात पुन्हा एकदा विवाहाच्या आमिषाने फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘मी सीबीआयचा अधिकारी आहे’ आणि ‘आंतरराष्ट्रीय प्रमाणित इथिकल हॅकर आहे’ असे भासवत एका तरुणाने 42 वर्षीय शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस तपास सुरू आहे.

फिर्यादीनुसार, शिरिष जयंतीलाल गोहेल उर्फ चिराग मित्तल (वय 27, रा. ससाणेनगर, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या वर्षी 18 जुलै रोजी संबंधित महिलेच्या संपर्कात आला. सोशल मीडियावरून ओळख सुरू झाली आणि त्यानंतर तो थेट तिच्या घरी गेला. तेव्हा त्याने स्वत:ला केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगितले. यासोबतच, तो आंतरराष्ट्रीय इथिकल हॅकर असल्याचाही दावा करत होता. त्याच्या बोलण्यांवर विश्वास ठेवून शिक्षिकेने त्याच्याशी मैत्रीचा अधिक संबंध वाढवला.
थोड्याच दिवसांत आरोपीने महिलेला लग्नाची मागणी घातली आणि तिचा विश्वास जिंकून वेगवेगळी कारणं देऊन पैसे मागायला सुरुवात केली. त्याने स्वतःच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेचे कारण दिले, बहिणीच्या डिलिव्हरीचे कारण सांगितले आणि अशा विविध निमित्तांनी महिलेकडून कधी ऑनलाईन, कधी रोख तर कधी धनादेशाच्या माध्यमातून तब्बल चार लाख रुपये घेतले. इतकेच नव्हे तर, महिलेकडील एक सोनसाखळी व दोन अंगठ्या एका फायनान्स कंपनीकडे तारण ठेवून 80 हजार रुपयांचे कर्ज काढून ते पैसेही स्वतःच्या उपयोगासाठी घेतले.
महिलेने पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने वेळकाढूपणा केला, टाळाटाळ केली. या सगळ्यामुळे महिलेला संशय आला आणि अखेर तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या 319(2) आणि 318(4) अन्वये शिरिष गोहेलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे प्रकरण घडण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच खराडी येथील एका महिलेसोबत अशाच पद्धतीची मोठी फसवणूक घडली होती. त्या प्रकरणात विवाह संकेतस्थळावरून ओळख काढून एका परदेशात स्थायिक असलेल्या भारतीय व्यक्तीने तब्बल 3 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केली होती. आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्ला याला पुणे सायबर पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली होती. त्याने बनावट प्रोफाइल तयार करून 3,194 महिलांशी संपर्क साधला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर आणि विवाह संकेतस्थळांवर ओळख करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बनावट ओळखी, खोटे दावे आणि भावनिक संमोहन वापरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत असून, कोणतीही आर्थिक मदत किंवा गुंतवणूक करताना पूर्ण खात्री करणे आवश्यक आहे.







