अक्षय टेमगिरे
Shirur News शिरूर , ता. ८ : शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई-शेलारवाडी येथे शेताच्या बांधाच्या वादाने पुन्हा हिंसक रूप धारण केले असून शेतकऱ्यावर काठी, दगड आणि लोखंडी खोऱ्याच्या दांड्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय बाळासाहेब शेलार (वय ३८, व्यवसाय शेती, रा. वडगाव रासाई-शेलारवाडी, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी काकासो बाबुराव शेलार आणि अक्षय काकासो शेलार (दोघे रा. वडगाव रासाई, ता. शिरूर) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. Shirur News
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास धनंजय शेलार हे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेजारील बांधकरी अक्षय शेलार याने बांध सरळ करण्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही वेळातच हा वाद थेट मारहाणीत बदलला. काकासो शेलार हा शेतात आला आणि शिवीगाळ करत धनंजय शेलार यांना खाली ढकलून काठीने मारहाण करू लागला. त्यानंतर अक्षय शेलार याने लोखंडी खोऱ्याच्या दांड्याने त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात धनंजय शेलार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. Shirur News
यावेळी आरोपींनी “बांध सरळ करून दिला नाही तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. जखमी अवस्थेत असलेल्या धनंजय शेलार यांना नातेवाईकांनी तातडीने मांडवगण पोलीस चौकीत आणले. त्यानंतर मांडवगण आणि न्हावरा येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलिस ठाण्यातचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गवळी करत आहेत.







