पुणे: एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. 6 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास पुण्यातील लोहियानगर परिसरात घडली. केवळ दुचाकीची चावी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला. छातीत मारलेल्या जोरदार ठोशामुळे तो कोसळला आणि रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याने प्राण सोडले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत व्यक्तीचे नाव सागर राजू अवघडे (वय 30) असे असून, आरोपी सूरज नंदू सकट (वय 24, रा. लोहियानगर) याला खडक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. दररोजसारखा एक सामान्य दिवस वाटणारा हा बुधवार त्यांच्या कुटुंबासाठी मात्र काळरात्र ठरला.
खडक पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास सागर आणि सूरज यांच्यात दुचाकीच्या चावीसंदर्भात वाद झाला. सुरुवातीला दोघांमध्ये सामान्य बाचाबाची झाली. मात्र वाद चिघळत गेला आणि सूरजने अचानक संतापाच्या भरात सागरच्या छातीत जोरात ठोसा मारला. या अनपेक्षित आणि जोरदार मारामुळे सागर तिथेच कोसळला आणि काही क्षणांतच बेशुद्ध झाला.
सागरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. छातीत बसलेल्या आघातामुळे अंतर्गत दुखापत झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. हा प्रकार उघडकीस येताच खडक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सूरज सकट याला ताब्यात घेतले.
रात्री उशिरा खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे करत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला असून अहवाल आल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल.
सागर आणि सूरज दोघेही रोजंदारीवर काम करणारे सामान्य मजूर. एका क्षुल्लक कारणावरून एवढ्या टोकाची कृती होईल, यावर परिसरातील नागरिकांना विश्वास बसत नाही. सागरच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे.







