पुणे: मान्सूनच्या हवामानात होत असलेल्या बदलांमुळे सध्या महाराष्ट्रात पावसाने बऱ्याच ठिकाणी उघडीप दिली आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून, काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी ढगाळ, उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येत आहे. सध्या राज्याच्या कोणत्याही भागात मुसळधार किंवा जोरदार पावसाचा कोणताही इशारा (अलर्ट) देण्यात आलेला नाही.

कोकणात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता नाही, काही ठिकाणी केवळ हलक्या सरी पडू शकतात. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्येही काहीसा असाच वातावरण राहणार असून घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर उर्वरित भागात उष्ण व दमट हवामान आहे.

धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे, तर जळगावमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये हवामान कोरडे आहे. तर हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणीत काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज असला तरी प्रत्यक्ष पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह सर्वच जिल्ह्यांत सध्या कोणताही पावसाचा अलर्ट नाही, येथे हवामान कोरडे असून उन्हाचा चटका जाणवत आहे.
एकंदरीत, राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असून, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात हवामानात काय बदल होतात आणि पुन्हा पाऊस परतणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






