मुंबई: गेल्या काही वर्षांत हवामानात झालेले बदल आता चिंताजनक वळणावर येऊन पोहोचले आहेत. या सर्वांमागे ‘अल निनो’ (El Nino) हे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्रशांत महासागरात निर्माण झालेली ही स्थिती संपूर्ण जगासह भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास संथ झाला असून, त्याचा थेट परिणाम पावसाच्या आगमनावर होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, यंदा सरासरीच्या 90 टक्के किंवा त्यापेक्षाही कमी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, उन्हाळ्यातील तीव्र उष्णता, त्यानंतर अचानक येणारे वादळी वारे आणि गारपीट यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अल निनोच्या काळातही 2015 मध्ये भारताला अशाच बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला होता. गेल्या 20 वर्षांतील आकडेवारी पाहता 2009, 2014 आणि 2015 या वर्षांत मान्सूनची सरासरी 90 टक्क्यांच्या खाली राहिली होती. प्रशांत महासागरातील वारे मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण करत आहेत, ज्याचा फटका वर्षभर बसण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यात अल निनोचा प्रभाव कमी राहील, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये तो मध्यम स्वरूपाचा असून सप्टेंबर महिन्यात तीव्र होण्याची शक्यता आहे.
कमी पावसामुळे कृषी क्षेत्र, वीज निर्मिती, पिण्याचे पाणी आणि उद्योग या सर्वांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः रबी पिकांसाठी हे धोकादायक ठरू शकते. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, देशाच्या अनेक भागांत तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. यंदा थंडीचे प्रमाणही कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.







