सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मुसळधार पावसामुळे (Solapur Flood) शेतजमीन, पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापपर्यंत सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जनावरेही दगावली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadanvis) यांनी दौरा केला. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करून तातडीने भरपाई देण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सीना दारफळ व निमगाव या गावांना भेट दिली. येथे पाहणी करून माढ्याकडे जात असताना, संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न केला. “आम्हाला तत्काळ मदत हवी आहे,” अशी तीव्र मागणी शेतकऱ्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यावेळी शेतकरी म्हणाले, “मुख्यमंत्री केवळ आश्वासन देत आहेत, पण कृती करत नाहीत.” मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.
या भागात मोठे नुकसान झाले असल्यामुळे प्रत्येक हेक्टरमागे 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.







