पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा पार पडली. यंदाच्या महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील माने दाम्पत्याला मिळाला. महापूजेनंतर राज्याच्या सुख-समृद्धीसाठी तसेच शेतकरी आणि बळीराजाच्या चांगल्या भविष्यासाठी अभिषेकही करण्यात आला.

यंदा शासकीय महापूजेचा मान मिळाल्यामुळे बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला असून ‘आम्ही सुखी झालो’ अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करताना त्यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शासकीय महापूजेनंतर व्हिडिओ शेअर करत राज्यातील शेतकरी, कष्टकरी, युवक आणि सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी व प्रगतीसाठी विठूमाऊलीच्या चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले. विठ्ठलाच्या कृपेने बळीराजाच्या श्रमांना पूर्ण यश लाभो आणि महाराष्ट्र नेहमी प्रगतीपथावर राहो, अशीही प्रार्थना केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील युवकांसाठी विकास आणि संधींचा नवा मार्ग तयार होत आहे. तरुण पिढीच्या अपेक्षा, स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने अनेक प्रयत्न सुरू आहेत. या सकारात्मक प्रवासाला पांडुरंगाचे आशीर्वाद मिळावेत, अशी प्रार्थना आपण विठ्ठलाच्या चरणी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पायी वारी करताना आलेला थकवा आणि अडचणी विसरून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. हातात टाळ, मुखात हरिनाम आणि मनात विठ्ठल अशी भक्तीची अनुभूती सध्या पंढरपूरमध्ये पाहायला मिळत आहे.






