नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. मात्र अटकेदरम्यान आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर मुख्य आरोपीला जामीन मिळाला आहे.

मृत तरुणाचे नाव सलमान अशफाक अन्सारी (रा. संघर्षनगर) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सलमान आणि एका तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. याच कारणावरून त्याचा मुजम्मील ऊर्फ मुज्जू हसन अली (वय 20, रा. गांजाखेत) याच्याशी काही दिवसांपासून वाद सुरू होता.

मंगळवारी मध्यरात्री टिपू सुलतान नगर चौक परिसरात दोघे समोरासमोर आले. त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी आरोपी मुजम्मीलने धारदार चाकूने सलमानवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सलमान गंभीर जखमी झाला.
घटनास्थळावरून त्याला तातडीने नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
प्रकरणाचा तपास करत यशोधरानगर पोलिसांनी मुख्य आरोपी मुजम्मील आणि त्याचा साथीदार साहील मलिक (वय 19, रा. चारखंबा, पाचपावली) यांना अटक केली. दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी अटकेच्या प्रक्रियेबाबत आक्षेप घेतला. अटक केल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांना त्याची माहिती देणे आणि अटकेचे कारण कळविणे ही कायदेशीर आवश्यकता असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित प्रक्रिया पूर्ण न झाल्याचा मुद्दा मांडण्यात आला.
या युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने अटकेतील प्रक्रियात्मक त्रुटी नोंदवली आणि मुख्य आरोपी मुजम्मील याला जामीन मंजूर केला. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, खून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून घटनेशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी करण्यात येत आहे.







