पुणे : भारतात कोरोनाने पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे.आंध्र प्रदेशात तब्बल 4 वर्षांनंतर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा शिरकाव केला असून, कडप्पा जिल्ह्यात या आजारामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, आणखी 4 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या नवीन रुग्णांना कडप्पा येथील वेगवेगळ्या भागात संसर्ग झाला असून, आरोग्य विभाग सध्या त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

बाधित आढळलेल्या 4 रुग्णांपैकी 3 जणांना त्यांच्या घरातच विलगीकरणात (होम आयसोलेशन) ठेवण्यात आले आहे. एका रुग्णामध्ये सौम्य लक्षणे दिसून आल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयातील विशेष कोरोना वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांनी कोरोना काळात लसीकरण पूर्ण केले होते आणि त्यातील एकाने बूस्टर डोस देखील घेतला होता. कडप्पा येथील वायरोलॉजी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या RT-PCR चाचणीत या चौघांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी तामिळनाडूतील सीएमसी वेल्लोर येथे उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. एका 60 वर्षीय वृद्धाला आधी तिरुपतीच्या SVIMS रुग्णालयात दाखल केले होते, मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना वेल्लोर येथे हलवण्यात आले. तिथे त्यांची RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आली. या रुग्णाला मधुमेह आणि किडनीच्या विकारासह इतरही गंभीर आजार होते.
तसेच एका 43 वर्षीय व्यक्तीचा देखील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला, ज्याचा शोध छातीच्या सीटी स्कॅन द्वारे लागला होता.
या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत सॅनिटायझेशनची मोहीम सुरू केली आहे. तसेच मृत आणि बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) शोध घेतला जात आहे.







