नाशिक: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या (Nashik News) कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणानंतर आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणामुळे संबंधित नामांकित कंपनीचे नाशिकमधील युनिट बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

लैंगिक शोषण, फसवणूक आणि धर्मांतराच्या आरोपांमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे. पोलीस तपास सुरू असल्याने सध्या कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. फक्त काही निवडक व्यक्तींनाच कंपनीत प्रवेश दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, या कंपनीतील कामगारांना मुंबई आणि पुण्यातील इतर प्रकल्पांमध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाशिक युनिट पूर्णपणे बंद होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे.
या प्रकरणात कंपनीतील मानव संसाधन विभागातील अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोपींची हिंमत वाढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचा अंदाज असून, विविध तपास यंत्रणा या प्रकरणात सहभागी होण्याची शक्यता आहे. आधीच विशेष तपास पथक तपास करत असून मिळालेली माहिती इतर यंत्रणांनाही देण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक पातळीवरही हालचाली वाढल्या आहेत. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या सर्व घडामोडींमुळे नाशिकमधील ही कंपनी सध्या केंद्रस्थानी आली असून, युनिट बंद होण्याच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.






