जळगाव: आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून 20 दिवसांपूर्वी चेन्नई गाठलेल्या जळगावच्या तरुणावर काळाने झडप घातली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. जामनेर) (Jalgaon) येथील जय नरेंद्र पाटील (वय 21) हा तरुण चेन्नईच्या प्रसिद्ध ‘गोल्डन बीच’वर समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत जयसह अन्य दोन जणही बेपत्ता आहे.

बी.ई. पूर्ण केल्यानंतर 5 फेब्रुवारी रोजीच तो नामांकित ‘कॉग्निझंट’ कंपनीत इंटर्नशिपसाठी रुजू झाला होता. शनिवारची सुट्टी असल्याने सर्व तरुण समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. आनंदात असलेल्या या मित्रांचा गट ‘गोल्डन बीच’वर सेल्फी काढण्यात मग्न होता, अचानक आलेल्या एका अक्राळविक्राळ लाटेनं या तरुणांना गाठलं आणि जयसह भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील मयुरी हरिश्चंद्र चौधरी ही आणि आणखी 2 जण समुद्रात ओढले गेले.
या घटनेपूर्वी अवघ्या काही तासांआधी जयने घरी फोन केला होता. “आई, आज सुट्टी आहे, मित्रांसोबत फिरायला जातोय,”. संध्याकाळी जेव्हा चेन्नई पोलिसांनी वडिलांना फोन केला, तेव्हा पाटील कुटुंबावर आभाळच कोसळलं. बहिणीची बारावीची परीक्षा थांबू नये आणि आईला हा धक्का सहन होणार नाही, म्हणून जयच्या वडिलांनी ही बातमी अजूनही त्यांच्यापासून लपवून ठेवली आहे. 24 तास उलटूनही जयचा शोध अद्याप लागू शकलेला नाही.







