Pune News : पुणे : शिक्षकांना भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारी किरण आणि काजल हे दोघे दुचाकीवरून फलटण येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेले होते. तेथे आपले काम पूर्ण करून ते घरी निघाले, मात्र बराच वेळ झाला तरी ते परतले नाहीत. त्यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत दोघे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
दरम्यान, शोध सुरू असतानाच माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरात नीरा उजवा कालव्यात दोन मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली. धर्मपुरी ते गुरसाळे दरम्यान कालव्यात हे मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसले. माहिती मिळताच नातेपुते पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी हे मृतदेह बेपत्ता असलेल्या किरण आणि काजल यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.
किरण काकासाहेब चोपडे, वय 26, आणि काजल काकासाहेब चोपडे, वय 23, अशी मृतांची नावे असून ते बारामती तालुक्यातील मेखळी गावचे रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, दोघांचा मृत्यू कालव्यात बुडाल्याने झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही मृतदेहांचे नातेपुते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून नंतर ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेमुळे चोपडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच वेळी घरातील दोन तरुण सदस्यांचा मृत्यू झाल्याने मेखळी गावातही शोककळा पसरली आहे. हा अपघात आहे की इतर काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






