हिंगोली: हिंगोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीसोबत बोलू न दिल्याच्या कारणातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फरीदखाँ पठाण असं हत्या झालेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शुक्रवारपासून फरीद बेपत्ता होता. फरीद बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आईनं मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार बासंबा पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी बासंबा शिवारात एक मृतदेह स्थानिकांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बसंबा पोलीस पथक घटना स्थळी पोहचले. घटनास्थळी पोलिसांना फरीदचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. चेहरा दगडाने ठेचलेला असल्याने तयाची लवकर ओळख पटत नव्हती. दरम्यान, फरीदच्या आईने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी फरीदच्या आईला घटनास्थळी बोलावलं. यावेळी तो मृतदेह आपल्याच मुलाचा असल्याचं फरीदच्या आईनं सांगितलं.
या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, फरीद हा एका पोरीसोबत बोलण्यात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून दोन जणांनी त्याची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. आरोपी तरुणाचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. यामध्ये फरीद अडथळा ठरत होता. त्यामुळे आरोपीनं फरीदला संपवण्याचा कट रचला. आरोपीने आपल्या एका मित्राच्या मदतीने फरीदची हत्या केली. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.







